कोकणशक्ती मुंबई प्रतिनिधी :
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होत आहे. या मोहिमेंतर्गत तीन महिन्यात राज्यातील ९ लाख ८४ हजार मुलींना एचपीव्ही लस देण्याचे लक्ष्य आरोग्य विभागाने ठेवले आहे.
गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी राष्ट्रीय ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेचा राज्यव्यापी शुभारंभ होत असून, १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या वयोगटातील मुलींना ‘गार्डसिल-४’ या लसीचा एक मोफत डोस देण्यात येणार आहे. राज्यातील एकूण ९ लाख ८४ हजार ४१४ मुलींना या मोहिमेचा लाभ मिळणार असून लसीकरण पूर्णपणे मोफत व पालकांच्या संमतीने ऐच्छिक स्वरूपात होणार आहे.
भारतामध्ये महिलांमधील कर्करोगांमध्ये गर्भाशयमुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर असून दरवर्षी सुमारे ८० हजार नवीन रुग्ण आढळतात व ४२ हजारांहून अधिक मृत्यू होतात. एचपीव्ही प्रकार १६ व १८ पासून संरक्षण देणारी ही लस अत्यंत प्रभावी मानली जाते. ही मोहीम सलग तीन महिने विशेष अभियान म्हणून राबविण्यात येणार असून त्यानंतर ती नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग होईल.
प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लसीकरण केले जाईल. सर्व लाभार्थ्यांची नोंदणी व प्रमाणपत्र वितरण केंद्र शासनाच्या U-WIN या डिजिटल पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे.
या लसीकरण मोहिमेचे महत्त्व विशद करताना आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गर्भाशयमुख कर्करोग हा वेळीच प्रतिबंधात्मक उपाय केल्यास टाळता येणारा आजार आहे. जागतिक स्तरावर या कर्करोगाचे निदान उशिरा झाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असते, मात्र किशोरवयातच दिलेली ही लस शरीरात आयुष्यभरासाठी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यास मदत करते. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी हे एक प्रभावी कवच ठरणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या स्तरावर देखील जनजागृती करण्यात येत असून, ग्रामीण भागात आशा स्वयंसेविकांमार्फत घरोघरी जाऊन पालकांचे समुपदेशन केले जाते.
३० मिनिटे आरोग्य केंद्रावर थांबणे आवश्यक
लसीकरणानंतर ३० मिनिटे आरोग्य केंद्रावर थांबणे आवश्यक आहे. काहीवेळा हलका ताप किंवा इंजेक्शन दिलेल्या जागी थोडे दुखणे यांसारखी किरकोळ लक्षणे दिसू शकतात, जी २-३ दिवसांत आपोआप बरी होतात.





