मालवण | प्रतिनिधी
वायरी (मालवण) येथील श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज संप्रदाय, मालवण आणि अनुलोम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक पेड माँ के नाम’ या पर्यावरण संवर्धन उपक्रमांतर्गत श्रीक्षेत्र दत्त मंदिर, वायरी बांध येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
भारत सरकारच्या ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानाला पाठिंबा देत अनुलोम संस्थेने महाराष्ट्रभर ५७ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून, त्याचाच एक भाग म्हणून मालवण येथे विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सद्गुरूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाची सामूहिक प्रतिज्ञा घेत वृक्षारोपणातून निसर्ग संरक्षणाचा संदेश दिला.
यावेळी अनुलोम संस्थेचे सचिव तथा भाजप एनजीओ आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक भालचंद्र राऊत यांनी पर्यावरण संरक्षणासाठी केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही, तर वृक्षांचे संगोपन आणि संवर्धनही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
संस्थेचे खजिनदार विनायक निवेकर यांनी अनुलोमच्या राज्यव्यापी वृक्षलागवड अभियानात समाजातील सर्व घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. मानसी केळूसकर यांनी केले.
यावेळी विनायक निवेकर, मानसी केळूसकर, पांडुरंग घाडीगावकर, अमिता निवेकर, महेश हूले, बंड्या तळाशीलकर, मिलिंद झाड, गोपाळ कवटकर, शेखर झाड, तृप्ती झाड, प्राची परब, प्रशांत परब, भूषण हूले, अमित आचरेकर, सुरेखा सातार्डेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







