नवी दिल्ली : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर यंदा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख ठळकपणे दिसणार आहे. यावेळी महाराष्ट्राच्या वतीने सादर होणारा चित्ररथ सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेवर आधारित असून, या उत्सवातून उभ्या राहणाऱ्या स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेच्या संकल्पनेवर विशेष भर देण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या चित्ररथाची यंदाची संकल्पना ‘गणेशोत्सव आणि स्वावलंबन’ अशी असून, सार्वजनिक गणेशोत्सवाने समाजाला एकत्र आणण्यासोबतच स्थानिक रोजगारनिर्मितीला कसा हातभार लावला आहे, याचे प्रभावी दर्शन या चित्ररथातून घडवले जाणार आहे. चित्ररथामध्ये गणेशमूर्ती घडवणारे मूर्तिकार, सजावट करणारे कलाकार, ढोल-ताशा पथके तसेच विविध पारंपरिक व सांस्कृतिक घटक साकारण्यात आले आहेत.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विचारांची आधुनिक मांडणी या चित्ररथातून करण्यात आली असून, सांस्कृतिक एकात्मता आणि आर्थिक स्वावलंबनाचा संदेश एकाच मंचावरून देशभर पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्ररथ सादर करणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाची यापूर्वीही विशेष दखल घेतली गेली आहे. मागील वर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ गड-किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर केंद्रित होता. यंदा मात्र उत्सव, परंपरा आणि रोजगार यांची सांगड घालणारी मांडणी पाहायला मिळणार आहे. कर्तव्यपथावर सादर होणारा हा चित्ररथ प्रेक्षकांसाठी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची आणि सामाजिक ताकदीची प्रभावी झलक ठरणार आहे.







