मालवण (प्रतिनिधी)
आचरा व परिसरातील हिंदू समाजात ऐक्य निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि धर्मावरील आघातांचा प्रतिकार करण्यासाठी येत्या १ मे रोजी आचरा टेंबवली येथील मांगल्य मंगल कार्यालय येथे दुपारी ३.३० वाजता ‘सकल हिंदू संमेलनाचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. ‘सकल हिंदू समाज, आचरा दशक्रोशी’ यांच्या वतीने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
सध्याच्या काळात देव, देश आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी हिंदू समाजाने संघटित होणे ही काळाची गरज बनली आहे. समाजापुढील विविध समस्यांचे निराकरण करणे, समाजावर होणाऱ्या आघातांना चोख प्रत्युत्तर देणे आणि एक बलशाली व समृद्ध समाज घडवणे हे या संमेलनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. एका सजग हिंदूच्या भूमिकेतून सर्वांनी या कार्यात तन, मन आणि धनाने सहभागी व्हावे. या धर्मकार्यासाठी संपर्क करणाऱ्या कार्यकर्त्यांना पूर्ण सहकार्य करावे आणि या ऐतिहासिक संमेलनास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन सकल हिंदू समाज, आचरा दशक्रोशीच्या वतीने करण्यात आले आहे.







