मालवण (प्रतिनिधी)
हिंदू धर्म जाती जाती मध्ये अडकून पडला आहे. मी पणा सोडून आपण हिंदू म्हणून एक आहोत हा विचार आपल्यामध्ये रुजला पाहिजे. यासाठी स्वतःमध्ये बदल घडवीत आपल्या कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे. हिंदू म्हणून आपण एकत्र आले पाहिजे, असे प्रतिपादन सावंतवाडी येथील डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांनी मालवण येथे सकल हिंदू संमेलनात बोलताना केले.
सकल हिंदू समाजाच्या वतीने आज सायंकाळी मालवण वायरी येथील आर.जी.चव्हाण मंगल कार्यालयात सकल हिंदू संमेलन संपन्न झाले. या संमेलनाचे उदघाटन सेवानिवृत्त सैनिक राजन कुमठेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा प. पू. कलावती माता संप्रदायच्या पद्मजा कुडाळकर व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन झाले. यावेळी प्रमुख वक्ते प्रा. डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, हिंदू संमेलनाचे संयोजक ऍड. पलाश चव्हाण, सहसंयोजक सौ. शिल्पा गाड आदी उपस्थित होते.
ऍड. पलाश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विविध नृत्ये सादर होऊन भोंदू बाबा विषयी जागृती निर्माण करणारी नाटिका सादर झाली. यावेळी गोसेवक, सर्पमित्र यांच्यासह सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. प्रवीणकुमार ठाकरे म्हणाले, पर्यावरण, संस्कृती, देशाभिमान अशा विविध गोष्टींमधून आपण आपल्या हिंदू धर्माची जपणूक केली पाहिजे, देशासाठी जगायला शिकले पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी माजी सौनिक राजन कुमठेकर व पद्मजा कुडाळकर यांनीही हिंदू धर्माबाबत विचार मांडले. सूत्रसंचालन प्रभुदास आजगावकर यांनी केले, आभार अविनाश कोळंबकर यांनी केले. यावेळी बहुसंख्येने हिंदू बांधव व भगिनी उपस्थित होत्या.







