मालवण (प्रतिनिधी)
कालावल खाडीतील अनधिकृत वाळू उपशावरून तळाशीलचे ग्रामस्थ व रेवंडीचे ग्रामस्थ यांच्यात उफाळलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी तळाशीलच्या ग्रामस्थांनी रेवंडी जेटी समोरील कालावल खाडीपात्रात चार ते पाच होडीद्वारे जमाव करत खाडी पात्रातच वाळू उपसा विरोधात अचानक आंदोलन सुरू केले. तळाशील ग्रामस्थांनी छेडलेल्या आंदोलनामुळे रेवंडी ग्रामस्थांनी देखील रेवंडी जेटी येथे धाव घेत तळाशील ग्रामस्थांना विरोध केल्याने वातावरण काहीसे तंग बनले होते. याची माहिती मिळतात मालवणचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप व बंदर विभागाचे निरीक्षक रजनीकांत पाटील यांनी रेवंडी जेटी येथे धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते. कालावल खाडीपात्रात रात्री उशिरापर्यंत तळाशील ग्रामस्थांचे होडीत बसून आंदोलन सुरू होते.
कालावल खाडीमध्ये रेवंडी समोरील भागात अनधिकृत वाळू उपश्याला तळाशिल ग्रामस्थांनी विरोध करत त्यावर कारवाई होण्यासाठी मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांना काही दिवसापूर्वी निवेदन देत खाडीपात्रात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या वाळू उपशाला विरोध केल्याच्या कारणावरून रेवंडी येथील ग्रामस्थांनी रेवंडी जेटीवर तळाशीलच्या मच्छिमारांना मासे वाहतुकीस तसेच वाहने लावण्यास विरोध केला, असा आरोप तळाशील ग्रामस्थांनी करत त्यामुळे मासे विक्रीस अडथळा होत असून मासे वाहतूक व वाहनांच्या सुरक्षिततेचे बाबत योग्य ती कार्यवाही करून तळाशिल ग्रामस्थांना सहकार्य करावे, अशी मागणीही तळाशील ग्रामस्थांनी मालवण तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली होती. या वादावर मालवण तहसीलदार कार्यालयात तहसीलदार गणेश लव्हे यांच्या उपस्थितीत तळाशील व रेवंडी ग्रामस्थ यांच्यात झालेल्या एकत्रित बैठकीत कोणताही समझोता झाला नव्हता.
रेवंडी जेटीसमोर कालावल खाडी पात्रात होणाऱ्या अनधिकृत वाळू उपशामुळे तळाशील गावाला धोका निर्माण होत असल्याचे सांगत वाळू उपशाला विरोध कायम राहिल तसेच आंदोलनाची भूमिका कायम राहिल असे तळाशील ग्रामस्थांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी तळाशीलच्या पुरुष व महिला ग्रामस्थानी चार ते पाच होड्यामध्ये बसून कालावल खाडीत रेवंडी जेटीसमोर कूच करत खाडी पात्रात आंदोलन सुरु केले. तळाशील ग्रामस्थांनी अचानक आंदोलन सुरु केल्याने रेवंडी ग्रामस्थांनी देखील जेटीवर धाव घेतली. यावेळी होड्यांमध्ये असलेल्या तळाशील ग्रामस्थ व जेटीवरील रेवंडी ग्रामस्थ यांच्यात वादाचे वातावरण निर्माण झाले. याबाबत माहिती मिळताच मालवणचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप व बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांनी आपापल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन रेवंडी जेटीवर धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर तळाशील ग्रामस्थांचे आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरु होते.







