मालवण दि प्रतिनिधी
भगवंतगड आचरा रस्ता कामाच्या दिरंगाईबाबत चिंदर ग्रामस्थ आक्रमक झाले असून येत्या चार दिवसात काम सुरू न झाल्यास ग्रामस्थ बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा चिंदर ग्रामपंचायत तर्फे बांधकाम कार्यकारी अभियंता यांना मेलद्वारे देण्यात आला आहे
आचरा चिंदर भगवंतगड बांदिवडेकडे जाण्यासाठी असलेल्या चिंदर भगवंतगड रस्त्याचे काम गेली दोन वर्षे रखडले असल्याने या रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांना धुळीतूनच प्रवास करावा लागत आहे.यामुळे या भागातील लोकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत आहे.तसेच गेले वर्षभर लब्देवाडी भगवंतगड एसटी सेवा बंद असल्याने आचरा हायस्कूल ला येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्याकडेला ठेकेदाराने लावलेल्या प्रसिद्धी फलकावर ४.३४० किलो मिटर रस्त्यासाठी अंदाजित २८१.०३ लक्ष खर्चाच्या या रस्त्याकामाचा शुभारंभ आदेश २६ ऑगष्ट २०२४ असून काम पूर्णत्वाची तारीख २५ ऑगष्ट २०२५ आहे. मात्र मार्च २०२६ उजाडले तरी रस्त्याचे काम जैसे थे च आहे. ग्रामस्थ लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे सदर ठेकेदाराने २५ फेब्रूवारी २०२६ला रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत ग्रामसेवक चिंदर यांना लेखी पत्र देत माऊली नगर चौक ते हायवे पर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याने २७ फेब्रूवारी ते ४ मार्च पर्यंत रस्ता बंद ठेवण्याबाबत विनंती केली होती.
मात्र फेब्रुवारी महिना संपून मार्च सुरू झाला तरी अजूनही काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.यामुळे चिंदर ग्रामपंचायत तर्फे प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग कार्यकारी अभियंता यांना मेल करत लेखी पत्र पाठवून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यात चिंदर भगवंतगड आचरा रस्ता प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत मंजूर असून सदर रस्त्याचे काम बालाजी कन्स्ट्रक्शने मक्त्याने घेतलेले आहे पण सदरच्या रस्त्याच्या कामामध्ये कॉन्ट्रॅक्टर दिरंगाई करत आहे. तसेच सदरच्या रस्त्याचे काम सुरू करून दोन वर्षे होत आली तरीही सदरचे काम अजूनही पूर्ण झालेले नसल्याने रस्त्यावरील धुरळ्याने वाहतूक करताना ग्रामस्थ व वाहनधारक त्रस्त बनले आहेत. हे असेच चालू राहिले तर त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच सदरच्या कॉन्ट्रॅक्टरने रस्त्यावर खडीचे ढीग ठेवले असल्याने सदरची खडी रस्त्यावर येऊन वाहतूक करताना ग्रामस्थांच्या गाड्या पंक्चर होत आहेत .तसेच गाड्यांचे अपघात सुद्धा होत आहेत त्यामुळे गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून सदरच्या रस्त्याचे काम पुढील चार दिवसात सुरू न झाल्यास ग्रामस्थ आपले कार्यालयासमोर आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत तरी आपण याकडे विशेष लक्ष देऊन सदरच्या कॉन्ट्रॅक्टरला योग्य ती समज देऊन सदरचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची सूचना द्यावी असे पत्र मेल केले आहे.






