मालवण (प्रतिनिधी)
गेले तीन दिवस सुरु असलेल्या वायंगणी गावच्या देवपळण व गावपळणीमध्ये आज सकाळी ११ वाजता मानकरी व ग्रामस्थांनी चिंदर गोसावीवाडी येथे विराजमान झालेल्या श्री देव रवळनाथाच्या श्रीफळ ठिकाणी गाव पुन्हा भरण्यासाठी कौल लावल्यावर देवाने गाव भरविण्याच्या बाजूने कौल दिला आहे. यामुळे वेशीबाहेर असलेल्या देवासह सर्व ग्रामस्थ आज पुन्हा गावात परतणार आहेत.
देवाने गाव पुन्हा भरविण्याचा कौल दिल्यानंतर दुपारी अडीज वाजता ग्रामस्थ वायंगणी गावातील श्री देव रवळनाथ मंदिरात जाऊन साफसफाई व पूजाअर्चा करणार आहेत. त्यानंतर पून्हा चिंदर गोसावीवाडी येथे येऊन श्री देव रवळनाथाचे श्रीफळ घेऊन रवळनाथ मंदिरात जाणार आहेत. त्यानंतर ३ वाजल्यानंतर वेशीबाहेर असलेले इतर ग्रामस्थ पुन्हा गावात परतण्यास सुरुवात होणार असून गेले तीन दिवस सुनासुना असलेला वायंगणी गाव सायंकाळपर्यंत पुन्हा गजबजणार आहे.







