मालवण | प्रतिनिधी
मालवण ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी स्वच्छता (सफाई) कामगारांना गेल्या चार महिन्यांपासून पगार न मिळाल्याने तीव्र असंतोष पसरला आहे. पगाराअभावी या कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून, काही कामगार भाड्याच्या खोलीत राहत असल्याने घरमालकांनी खोली खाली करण्याच्या सूचना दिल्याचेही समोर आले आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी आमदार नीलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मालवण ग्रामीण रुग्णालयात ठेकेदार एजन्सीमार्फत स्वच्छता कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने किमान वेतनानुसार या कामगारांचे १६ हजार रुपये मानधन निश्चित केले असताना, प्रत्यक्षात मात्र अनेक वर्षांपासून फक्त १० हजार रुपये देऊन बोळवण करण्यात येत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. त्यातच गेले चार महिने मानधनही अदा करण्यात आलेले नाही.
कामगारांनी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला असता, प्रशासनाकडून केवळ ठेकेदाराशी संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या जात असल्याचा आरोप आहे. तसेच कामासाठी आवश्यक असणारे स्वच्छता साहित्य उपलब्ध करून दिले जात नसल्याने कामगारांना पदरमोड करून खर्च करावा लागत आहे. कंत्राटी पद्धतीत कामगारांना पीएफ, गणवेश, ग्लोव्हज व सुरक्षा साहित्य देण्याची तरतूद असतानाही ते देण्यात आलेले नाही, याबाबतही कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या सर्व बाबींची माहिती देऊनही ग्रामीण रुग्णालय प्रशासन ठेकेदारावर कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. पगारासंदर्भात प्रशासकीय विभागांकडून सहकार्य मिळत नसल्याने आणि किमान वेतनानुसार मानधन मिळावे यासाठी आता कामगारांनी लोकप्रतिनिधींकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, या संदर्भात कामगारांनी मालवणचे नगरसेवक व शिंदे शिवसेनेचे मालवण शहरप्रमुख दीपक पाटकर यांना निवेदन सादर करून आपली व्यथा मांडली आहे. आता या प्रश्नावर शिवसेना थेट दखल घेणार असल्याने कामगारांना न्याय मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






