मालवण, दि. १६ : मालवण नगरपरिषदेच्या कारभारावर ठाकरे गटाच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या टीकेला शिवसेना नगरसेविका भाग्यश्री मयेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माजी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकाळातील प्रलंबित आणि रखडलेल्या कामांचा दाखला देत, त्यांच्या अपयशाचा पाढा आम्हीच नव्हे तर जनताही कायम वाचणार असल्याचा टोला मयेकर यांनी लगावला.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मयेकर यांनी म्हटले आहे की, मालवण नगरपरिषदेत विद्यमान सत्ताधारी सत्तेत आल्यानंतर अवघ्या आठ महिन्यांत त्यांना अपयशी ठरविण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, मागील कार्यकाळातील प्रलंबित कामांची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी त्याचे खापर विद्यमान सत्ताधाऱ्यांवर फोडणे योग्य नाही.
माजी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकाळात मालवण शहरातील अनेक महत्त्वाची कामे रखडली किंवा पूर्णत्वास गेली नाहीत, असा आरोप मयेकर यांनी केला. मत्स्यालयासाठी प्रस्तावित निधी परत का गेला, भुयारी गटार योजना अद्याप पूर्ण का झाली नाही, सफाई कामगार संकुलाचे काम का रखडले, भाजी मार्केट अद्याप पूर्ण का झाले नाही आणि प्रस्तावित नळपाणी योजनेला मंजुरी मिळण्यासाठी सहा वर्षे का लागली, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
“मागील अकरा वर्षांत माजी आमदारांनी मतदारसंघात उल्लेखनीय काम केले असते, तर जनतेने त्यांना माजी केले नसते. कुडाळ-मालवणच्या जनतेनेच वैभव नाईक यांना निवडणुकीत पराभूत केले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील अपूर्ण आणि रखडलेल्या कामांचा उल्लेख होतच राहणार,” असे मयेकर यांनी स्पष्ट केले.
राधिका मोंडकर यांच्यावरही निशाणा
ठाकरे गटाच्या शहराध्यक्ष राधिका मोंडकर यांच्यावर टीका करताना मयेकर यांनी राजकारणात नुकत्याच आलेल्या व्यक्तींनी वस्तुस्थितीची शहानिशा करून भूमिका मांडावी, असा सल्ला दिला. एका बाजूला नगरपरिषदेच्या स्वच्छतेवर टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला विद्यमान नगरसेवकांसोबत स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन फोटोसेशन करायचे, ही भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप त्यांनी केला.
एआय व्हिडिओच्या माध्यमातून माजी आमदारांच्या कथित अपयशी कारभारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही मयेकर यांनी केला. “राजकारणात जनतेचे मूल्यमापन महत्त्वाचे असते. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे राजकारण थांबवावे,” असे त्या म्हणाल्या.
‘उपोषण करायचे असेल तर माजी आमदारांच्या घराबाहेर करा’
मालवण नगरपरिषदेतील प्रलंबित प्रश्नांवर उपोषण करण्याची इच्छा असल्यास ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्या घराबाहेर उपोषण करून त्यांच्या कार्यकाळातील रखडलेल्या कामांचा जाब विचारावा, असे आव्हान मयेकर यांनी दिले. त्यावेळी जनताही मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रश्न विचारेल, असा दावा त्यांनी केला.
‘आमदार निलेश राणे विकासासाठी कटिबद्ध’
मालवण शहराच्या गतिमान विकासासाठी आमदार निलेश राणे कटिबद्ध असल्याचे मयेकर यांनी म्हटले आहे. विकासासाठी दूरदृष्टीसोबत निधी खेचून आणण्याची धमक आवश्यक असून ती आमदार निलेश राणे यांच्यात आहे, असा दावा त्यांनी केला.
आमदार निलेश राणे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणत मालवण शहराच्या विकासाला गती देण्यास सुरुवात केली आहे. मागील दहा वर्षांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याचे काम सुरू असल्याचेही भाग्यश्री मयेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे.







