मालवण : (प्रतिनिधी)
मालवण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धामापूर नळपाणी योजनेच्या विहिरीतील गाळ उपसा कामामुळे मालवण शहर व परिसरातील पाणी पुरवठा बंद होता. राजकोट परिसरातील बबन रेडकर व लगतच्या कुटुंबियांना पाण्याचा अन्य स्रोत नसल्याने त्या कुटुंबियांची पाण्याची गरज ओळखून मालवण नगरपालिकेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी या ठिकाणी स्व:खर्चाने पाणीपुरवठा केला.
दरम्यान, धामापूर नळपाणी योजनेच्या विहिरीतील गाळ उपसा काम पुर्ण झाले आहे. मात्र काही ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा होताना समस्या निर्माण होत आहेत. मात्र त्या समस्या दूर करण्याचे काम नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाकडून सुरु असून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सहदेव बापर्डेकर यांनी सांगितले.







