मालवण (प्रतिनिधी)
आजची युवा पिढीतील मुले अंमली पदार्थ सेवन, चोऱ्या, वाहन अपघात आदी गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अडकल्याचे दिसत आहे. गुन्हा दाखल असलेल्या मुलांच्या पुढील शिक्षण व करियरवर विपरीत परिणाम होतात. मुलांनी आपल्याकडून चुकीचे काही घडू नये याची काळजी घेताना कायद्याविषयी माहिती घेऊन वाटचाल करावी , असे प्रतिपादन मालवणचे ऍड. पलाश चव्हाण यांनी केले.
जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलमध्ये सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात भंडारी हायस्कुलचे माजी विद्यार्थी आणि वकील पलाश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना कायदे, सेवा व हक्क याविषयी मार्गदर्शन केले. प्रशाळेचे मुख्याध्यापक हणमंत तिवले यांनी ऍड. पलाश चव्हाण यांचे स्वागत केले. यावेळी व्यासपिठावर पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, शिक्षक संदीप अवसरे, शिक्षिका संजना सारंग, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी ऍड. पलाश चव्हाण यांनी आपले सरकार या पोर्टलद्वारे शासनाकडून मिळणारे विविध दाखले व कायदेविषयक सेवा याची माहिती दिली. ऍड. चव्हाण म्हणाले, आज जेल मध्ये १७ ते २० वयोगटातील मुले विविध गुन्ह्यात शिक्षा भोगताना दिसतात. ड्रग्सने शरीराचे नुकसान होते. तर मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांवर मानसिक विकृती सारखे परिणाम होत आहेत. आपले जीवन हे विविध कायद्यानी बांधले गेले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे समाजात कसे वागले पाहिजे, पालकांशी व शिक्षकांशी कसे आदराने वागले पाहिजे हे आपल्याल्यावरच अवलंबून आहे, अन्यथा आपले जीवन चुकीच्या मार्गाने जाऊ शकते, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई यांनी केले. आभार पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे यांनी मानले.






