मालवण – प्रतिनिधी
दिव्यांगत्वावर मात करून जिद्दीने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी शासन आणि प्रशासन खंबीरपणे उभे आहे. दिव्यांग मुलांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी ‘शिक्षण’ हेच प्रभावी शस्त्र आहे, असे प्रतिपादन मालवण पंचायत समितीच्या सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी येथे बोलताना केले .
मालवण पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत (समग्र शिक्षा अभियान) तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य साहित्य व साधने वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सभापती प्रज्ञा चव्हाण या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर उपसभापती घनश्याम झाड, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, गटशिक्षणाधिकारी संजय माने, गट समन्वयक प्रशांत पारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपसभापती झाड यांनी “केवळ शिक्षण असून चालत नाही, तर दिव्यांगांना त्यांच्या शारीरिक उणिवा भरून काढण्यासाठी आधुनिक साधनांची जोड आवश्यक असते. विद्यार्थ्यांनी या साहित्याचा वापर अभ्यासातील प्रगतीसाठी करावा असे सांगितले तर गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला. ते म्हणाले, “दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यांना भविष्यात कोणतीही मदत लागल्यास किंवा तांत्रिक अडचणी असल्यास त्यांनी थेट पंचायत समितीशी संपर्क साधावा. प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.”
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समग्र शिक्षा अभियानातील विषय तज्ञ गौरी नार्वेकर, आरती कांबळे, ममता जोगल आणि वरिष्ठ सहाय्यक वैभव वाघाटे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच तालुक्यातील विशेष शिक्षक विकास रुपनर, स्वप्निल पाटणे, महेश चव्हाण, हनुमंत तावडे आणि भाऊराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून त्यांना आवश्यक साहित्याचे नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय तज्ञ गौरी नार्वेकर यांनी केले. शेवटी, गट समन्वयक प्रशांत पारकर यांनी आभार मानले.







