मुंबई : महाराष्ट्रातील तब्बल 2.08 कोटी मतदारांची नावे 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या विशेष सघन मतदारयादी पुनरिक्षणाच्या (SIR) प्रारूप मतदारयादीत समाविष्ट नसण्याची शक्यता आहे. मात्र, ही नावे कायमस्वरूपी मतदारयादीतून वगळण्यात आलेली नाहीत, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रातील एकूण 9.78 कोटी मतदारांपैकी 7.71 कोटी मतदारांनी 17 ऑगस्टपर्यंत आपले भरलेले आणि स्वाक्षरी केलेले Enumeration Forms जमा केले आहेत. हे प्रमाण 78.85 टक्के आहे. तर 2.07 कोटी मतदारांचे फॉर्म ‘Uncollectable Enumeration Forms’ या श्रेणीत आहेत. हे प्रमाण राज्यातील एकूण मतदारसंख्येच्या सुमारे 21.15 टक्के आहे.
1.10 कोटी मतदार मृत किंवा स्थलांतरित श्रेणीत
या 2.07 कोटी मतदारांपैकी निम्म्याहून अधिक मतदारांची नोंद मृत किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित अशी करण्यात आली आहे. आणखी 17.63 लाख मतदार दुबार नोंदणी किंवा अन्य ठिकाणी आधीच नोंदणीकृत असल्याच्या श्रेणीत आहेत. सुमारे 2.23 लाख मतदार ‘Others’ या श्रेणीत आहेत. यामध्ये Enumeration Form मिळूनही तो भरून परत न केलेल्या मतदारांचा समावेश आहे.
मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक प्रमाण
SIR प्रक्रियेत शहरी भागातील मतदारांचे फॉर्म मोठ्या प्रमाणावर जमा न झाल्याचे दिसून आले आहे. ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये तब्बल 94.47 लाख मतदारांचे फॉर्म जमा झालेले नाहीत. राज्यातील एकूण अशा फॉर्मपैकी हे प्रमाण सुमारे 45.4 टक्के आहे.
ठाण्यात 28.88 लाख, मुंबई शहरात 9.60 लाख, मुंबई उपनगरात 26.99 लाख, तर पुण्यात 28.99 लाख मतदारांचे फॉर्म जमा झालेले नाहीत.
नागपुरात 14.06 लाख, पालघरमध्ये 6.87 लाख आणि रायगडमध्ये 5.91 लाख मतदार या श्रेणीत आहेत. या सात जिल्ह्यांमध्ये मिळून सुमारे 1.21 कोटी मतदार येतात.
ग्रामीण भागात स्थिती तुलनेने चांगली
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण जिल्ह्यांमध्ये फॉर्म न जमा होण्याचे प्रमाण कमी आहे. हिंगोलीमध्ये 8.82 टक्के, बुलढाण्यात 9.10 टक्के, रत्नागिरीत 9.93 टक्के आणि लातूरमध्ये 10.62 टक्के मतदारांचे फॉर्म जमा झालेले नाहीत. अधिकाऱ्यांच्या मते, मुंबई, ठाणे आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणातील स्थलांतर आणि पत्ते बदलल्यामुळे अनेक मतदारांपर्यंत पोहोचण्यात अडचणी आल्या.
नाव गायब झाल्यास काय करायचे?
निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे की 24 ऑगस्टची यादी ही प्रारूप मतदारयादी आहे. त्यात नाव नसणे म्हणजे मतदाराचे नाव कायमस्वरूपी वगळले गेले आहे, असा अर्थ होत नाही.
24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर या कालावधीत मतदारांना नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी दावा-हरकती दाखल करता येणार आहेत. पात्र मतदाराने नाव समाविष्ट करण्यासाठी Form 6, विद्यमान नोंदीतील दुरुस्तीसाठी Form 8, तर एखाद्या नावाच्या समावेशावर आक्षेप घेण्यासाठी Form 7 वापरता येईल.
दाव्यांची आणि हरकतींची छाननी केल्यानंतर पात्र मतदारांची नावे अंतिम मतदारयादीत समाविष्ट केली जातील. अंतिम मतदारयादी 27 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध होणार आहे.
मतदारांसाठी महत्त्वाचा इशारा
त्यामुळे 24 ऑगस्टला SIRची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक मतदाराने आपले नाव मतदारयादीत आहे की नाही, हे तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. नाव आढळले नाही तर निर्धारित मुदतीत दावा दाखल करून आपली नोंद कायम ठेवण्याची संधी मतदारांना उपलब्ध आहे.







