वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे आठवे पुष्प गोळवण येथे संपन्न
मालवण (प्रतिनिधी) :
माता रमाई आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संसार सांभाळत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाला खंबीर साथ दिली. रमाईंचे जीवन म्हणजे संघर्षातून उभ्या राहिलेल्या एका महान स्त्रीची प्रेरणादायी गाथा आहे. त्यांच्या त्यागामुळे आणि बाबासाहेबांना दिलेल्या भक्कम साथीमुळे आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात रमाईंचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन बार्टीचे समतादूत तथा भारतीय बौद्ध महासभेचे तालुका प्रचार-पर्यटन उपाध्यक्ष संग्राम कासले यांनी केले.
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण, महिला शाखा आणि संस्कार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिका २०२६ मधील आठवे पुष्प गोळवण गाव शाखेच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी प्रवचनातून माता रमाईंच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीप व धूप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित उपासक-उपासिकांनी त्रिसरण व पंचशील ग्रहण केले. गाव शाखेच्या वतीने मोहन पवार यांनी तालुका शाखेचे पदाधिकारी आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस संजय पेंडुरकर, जिल्हा संस्कार उपाध्यक्षा नेहा पेंडुरकर, तालुका अध्यक्ष रविकांत कदम, तालुका सरचिटणीस नचिकेत पवार, तालुका कोषाध्यक्ष प्रकाश पवार, तालुका संस्कार उपाध्यक्ष सूर्यकांत कदम, तालुका संस्कार सचिव मिलिंद पवार, तालुका संस्कार सचिव सचिन कासले, तालुका प्रचार-पर्यटन सचिव संदीप कदम, वडाचापाटचे कोषाध्यक्ष तुषण कासले, तसेच गाव शाखा मसदे अध्यक्ष तानाजी कदम, कोषाध्यक्ष प्रशांत मसदेकर, साळेलचे प्रशांत जाधव, गोळवण गाव शाखा उपाध्यक्ष अरविंद पवार, सचिव मोहन पवार यांच्यासह मोठ्या संख्येने उपासक-उपासिका उपस्थित होते.
यावेळी संजय पेंडुरकर, रविकांत कदम आणि सूर्यकांत कदम यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार विभागाचे सचिव सचिन कासले यांनी केले. तालुका कोषाध्यक्ष प्रकाश पवार यांनी आभार मानले. तर गाव शाखेच्या वतीने मोहन पवार यांनी उपस्थित मान्यवर आणि उपासक-उपासिकांचे आभार व्यक्त केले.






