‘हर घर तिरंगा’ आणि ‘देश प्रथम’चा संदेश देत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
मालवण, प्रतिनिधी : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरातील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलच्या वतीने शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. हातात डौलाने फडकणारा तिरंगा, ओठांवर देशभक्तीपर घोषणा आणि मनात भारतमातेविषयी अभिमान, अशा उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रॅलीत सहभागी झाले.
मालवण शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणाऱ्या या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनातून राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकता आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.
रॅलीच्या माध्यमातून ‘हर घर तिरंगा’, ‘देश प्रथम’ आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजविण्यासोबतच स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची जाणीव करून देणे आणि राष्ट्राच्या भवितव्यासाठी जबाबदार नागरिक होण्याची प्रेरणा देणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.
तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नसून देशाच्या स्वाभिमानाचे आणि असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे प्रतीक आहे, हा संदेश रॅलीतून प्रभावीपणे देण्यात आला.






