मालवण (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर खुलासा करावा, अशी मागणी विजय केनवडेकर यांनी केली आहे. मे आणि जून महिन्यात विद्युतवाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सुमारे ४८ लाख रुपये खर्च करण्यात आले असून, जिल्हाभरात पावसाळी देखभालीसाठी तब्बल ४ कोटी रुपयांची तरतूद असताना पाच-पाच तास वीज खंडित होणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पालकमंत्र्यांच्या विशेष प्रयत्नातून देखभालीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेले असतानाही त्याचा प्रभावी वापर झाला का, तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून याबाबतचा तपशील का मागवला जात नाही, अशी विचारणा केनवडेकर यांनी केली. नवीन नियमांनुसार व्यावसायिक (कमर्शियल) वीजजोडणीधारकांचा वीजपुरवठा एका तासापेक्षा अधिक काळ खंडित राहिल्यास महावितरणला ग्राहकांना नुकसानभरपाई द्यावी लागते. मात्र, या नियमाची अंमलबजावणी आणि व्यावसायिकांचे नुकसान याबाबत कोणीही ठोस भूमिका घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
स्मार्ट मीटरचे बिल वेळेत न भरल्यास मध्यरात्रीही वीजपुरवठा तात्काळ खंडित केला जातो. मात्र, दुसरीकडे वारंवार होणाऱ्या वीज खंडितमुळे व्यापारी आणि व्यावसायिकांचे होणारे नुकसान दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. व्यापारी संघटनांचे पदाधिकारी सातत्याने या प्रश्नावर आवाज उठवत असताना इतर सर्व संबंधितांनीही एकत्र येऊन दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठ्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विजय केनवडेकर यांनी केले.







