मालवण दि प्रतिनिधी
समाजात स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी अगोदर स्त्री आणि पुरुष ही नाती सक्षम बनली पाहिजेत त्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी डोळसपणे प्रयत्न केले तरच जागतिक महिला दिन साजरा केल्याचे सार्थक ठरेल, असे प्रतिपादन मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना कोदे यांनी येथे बोलताना केले
मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी सौ. अर्चना कोदे या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर, मुख्याध्यापक एच. बी. तिवले, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, सहाय्यक शिक्षिका पुनम मेस्त्री, सौ सरोज बांदेकर आदी वा इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी सौ. कोदे यांनी दिप प्रज्वलन करून आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. प्रारंभी मुख्याध्यापक एच. बी. तिवले यांनी स्वागत केले. तर सौ.बांदेकर यांनी प्रास्ताविक केले तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ. ज्योती रेवणकर यांनी केला.
यावेळी बोलताना सौ. अर्चना कोदे यांनी “त्यागून मी भोग” अशी जागतिक महिला दिनाची यावर्षीची संकल्पना आहे. त्यामुळे मी कशाचा त्याग करायचा आणि कशाचा उपभोग घ्यायचा हे प्रत्येक सुज्ञ महिलेने जाणले पाहिजे, स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत विचार केला तर स्त्री पुरुष सक्षमतेसाठी ही दोन्ही नाती सक्षम व्हायला हवी, असे सांगून त्या म्हणाल्या आज महिलांच्या बाजूने अनेक कायदे आहेत, म्हणून महिलांनी त्याचा गैरफायदाही घेता कामा नये, काही ठिकाणी कायद्याचा गैरफायदा घेतला जात असल्याची अनेक उदाहरणे समोर येत असताना समाजाने ज्याच्यावर अन्याय किंवा अत्याचार होत आहे, मग तो स्त्री असो अथवा पुरुष असो त्याच्या बाजूने सजगपणे आणि सक्षमपणे ठाम उभे राहिले पाहिजे,असेही त्या म्हणाल्या
यावेळी श्री. कवटकर यांनी उपस्थिताना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल देसाई यांनी केले. शेवटी पूनम मेस्त्री यांनी आभार मानले.







