मालवण (प्रतिनिधी) : हवामानातील बदल तसेच कीड-रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या हंगामात आंबा उत्पादनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आंबा बागायतदार शेतकरी व व्यापारी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे तातडीने नुकसानभरपाई, कर्जमाफी व विविध सवलती जाहीर कराव्यात, या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक सहकारी संघ व मालवण तालुक्यातील आंबा बागायतदार-व्यापाऱ्यांनी तहसीलदार गणेश लव्हे यांना निवेदन सादर केले.
मालवण येथील वायरी परिसरातील आर. जी. चव्हाण मंगल कार्यालयात आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यवसाय वृद्धीसंदर्भात सभा आयोजित करण्यात आली होती. सभेनंतर आंबा व्यावसायिकांनी तहसीलदारांची भेट घेत विविध समस्यांकडे लक्ष वेधले. यावेळी आप्पा चव्हाण, आप्पा लुडबे, संतोष लुडबे, नगरसेविका नीना मुंबरकर, नगरसेवक तपस्वी मयेकर, अनिकेत फाटक, दाजी हडकर, मनोज लुडबे, चंद्रशेखर मांजरेकर, आनंद देसाई, गोविंद चव्हाण, विजय फाटक, विनायक आरोलकर, सौगंधराज बांदेकर, विष्णू देऊलकर, गोविंद गांवकर, किशोर पवार, सचिन नार्वेकर, गणेश लुडबे आदी उपस्थित होते.
मालवण तालुक्यातील विविध भागांत प्रत्यक्ष पाहणीदरम्यान आंबा बागायतदारांची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनियमित हवामान, तापमानातील तीव्र चढ-उतार आणि किड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे अनेक बागांमध्ये फळधारणा अत्यल्प किंवा पूर्णतः शून्य राहिली आहे. उत्पादन खर्च, मजुरी, औषधे, खते आणि कर्जबोजा यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडल्याची व्यथा बागायतदारांनी यावेळी मांडली.
निवेदनातून बाधित आंबा बागायतदारांना प्रति हेक्टर किमान पाच लाख रुपये नुकसानभरपाई अथवा पर्यायी निकषानुसार गुंठा पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कराराने बाग कसणाऱ्या शेतकऱ्यांनाच प्रत्यक्ष लाभार्थी म्हणून नुकसानभरपाई देण्याची स्पष्ट तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली.
आंबा पिकासाठी घेतलेली सर्व प्रकारची बँक व वित्तीय कर्जे तातडीने गोठवून आगामी कर्जमाफी योजनांमध्ये आंबा बागायतदारांचा प्राधान्याने समावेश करावा, तसेच कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांनाही एनडीआरएफ निकषांनुसार पूर्ण नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय गिर्ये येथील आंबा संशोधन केंद्राचे आधुनिकीकरण करून ते कार्यान्वित करावे, कीड-रोग नियंत्रणासाठी संशोधन व प्रशिक्षण सुविधा उपलब्ध कराव्यात, आंबा पिकासाठी लागणाऱ्या औषधे व खतांचे दर नियंत्रणात ठेवावेत तसेच बनावट औषधे व निकृष्ट खत विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, अशा मागण्याही करण्यात आल्या.
सद्यस्थितीत आंबा बागायतदार अत्यंत बिकट परिस्थितीत असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंबा बागायतदार व व्यापाऱ्यांनी दिला आहे.







