मालवण, दि. (प्रतिनिधी) :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून तसेच राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बहुप्रतीक्षित मुंबई–विजयदुर्ग रो-रो बोट सेवा अखेर सुरू झाली असून कोकणवासियांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न साकार झाले आहे. या बोटसेवेच्या शुभारंभ फेरीदरम्यान भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांनी मंत्री नितेश राणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
कोकण किनारपट्टीला जलमार्गाने मुंबईशी जोडणारी ही सेवा सुरू झाल्यामुळे प्रवास सुलभ होण्याबरोबरच कोकणातील पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याचे मत अशोक सावंत यांनी व्यक्त केले. अनेक वर्षांपासून कोकण बोटसेवा सुरू करण्याची मागणी प्रलंबित होती. मात्र पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात उतरला असल्याचे त्यांनी नमूद केले.
पूर्वीच्या काळात जलवाहतूक हेच कोकणच्या दळणवळणाचे प्रमुख साधन होते. मालवण, देवगड आणि वेंगुर्ला ही बंदरे व्यापारी दृष्ट्या समृद्ध होती. काळाच्या ओघात ही सेवा बंद पडल्याने किनारपट्टीवरील आर्थिक हालचाली मंदावल्या. अनेक प्रयत्न होऊनही बोट सेवा पुन्हा सुरू होऊ शकली नव्हती. मात्र बंदरे विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी कोकण–मुंबई बोट सेवा सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत हा प्रकल्प मार्गी लावला.
या बोटसेवेचा विस्तार आगामी काळात मालवण व वेंगुर्ला बंदरापर्यंत करण्यात आल्यास स्थानिक पर्यटनाला मोठा फायदा होईल, असेही सावंत यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्याला देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यामागे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे योगदान असल्याचे नमूद करत, देशी-विदेशी पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता ही जलवाहतूक सेवा कोकणच्या विकासासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ही सेवा सातत्याने सुरू राहावी तसेच टप्प्याटप्प्याने मालवण, देवगड व वेंगुर्ला येथे बोट सेवा विस्तारित करण्यात यावी, यासाठी जिल्हावासियांच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांना लवकरच निवेदन सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कुडाळचे माजी नगराध्यक्ष विनायक राणे, योगेश चांदोसकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई–विजयदुर्ग रो-रो बोटसेवा सुरू झाल्यामुळे कोकणच्या वैभवशाली जलपरंपरेच्या आठवणी पुन्हा जागृत झाल्या असून कोकणच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.







