मालवण दि प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सतत स्वतःची चिकित्सा करण्याचा आदर्श घालून दिला आणि समाजाला स्वतंत्र विचारांची दिशा दिली. मात्र बहुजनानी त्यांचा हा गुण न घेतल्यामुळे आपले मस्त दुसऱ्याच्या ताब्यात देऊन बहुजन धोक्यातच आले.त्यामुळेच आता अभिजन वर्ग बहुजनांना जात – धर्मात अडकवून त्यांचं अस्तित्व संपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे.असे स्पष्ट प्रतिपादन जेष्ठ कवी अजय कांडर यांनी मालवण कट्टा येथे आयोजित केलेल्या ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना ‘ या व्याख्यानात केले.
मालवण कट्टा येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया मालवण शाखेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त कवी कांडर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष रविकांत कदम तसेच बॅ. नाथ पै सेवांगण मालवणचे विश्वस्त दीपक भोगटे, माजी जिल्हाध्यक्ष एम.आर डांगमोडेकर, जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, जिल्हा सरचिटणीस संजय पेंडुरकर ,जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, जिल्हा संस्कार सचिव विलास वळंजु प्रा.डॉ नंदू हेदुळकर,.जिल्हा महिला संस्कार उपाध्यक्ष स्नेहा पेंडुरकर,तालुका महिला अध्यक्ष नेहा काळसेकर, सरचिटणीस समता डिकवलकर, कोषाध्यक्षा अपेक्षा पेंडूरकर, जिल्हा संघटक लीना तळगावकर, अ.भा अनिसचे विजय चौकेकर, अमित पवार, शंकर कदम, मिलिंद पवार, योगेश वराडकर, सचिन कासले, संग्राम कासले, रमेश कदम, मनोज काळसेकर, अर्जुन पेंडूरकर,विशाल डिकवलकर,भरत पेंडुरकर, संकेत पेंडुरकर, मेजर अरुण जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सुनीत डांगमोडेकर व सुनिता सुरेश कदम यांचा सेवानिवृत्तीपर व संदीप पेंडुरकर यांचा संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना अजय कांडर म्हणाले, समतेचा मार्ग म्हणजे विशिष्ट गटाच्या लोकांनी एकत्र येऊन चर्चा करणे नाही.तर समान विचाराच्या आणि निखळ माणूस म्हणून जगणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येणे म्हणजे समतेने पुढे जाणे होय. बाबासाहेबानी एकूण समाजासाठी काम केले. म्हणून त्यांनी तयार केलेल्या संविधानामुळे समाजातल्या सर्व स्तरातल्या माणसांना न्याय मिळत आहे. मात्र आपण छोटे छोटे गट करून छोट्या छोट्या गटांचं नेतृत्व महत्त्वाचं मानल्यामुळे आपले जगणे धोक्यात आले. तरीही अजून आपण आत्मपरीक्षण करायला तयार नाही आणि अभिजन वर्ग मात्र या सगळ्याची संधी घेऊन बहुजनांना जाती-धर्मात अडकवून बहुजनांची रोजी रोटीच हिरावून घेत आहे.
छोट्या छोट्या सांस्कृतिक प्रबोधनपर कार्यक्रमाची साखळी निर्माण करणे ही आज गरज निर्माण झाली आहे. असे प्रबोधन झाले की बहुजन वर्गातील दुर्लक्षित वर्गाला आत्मभान येत जाईल आणि त्यातून तो संघटित होण्याचा प्रयत्न करेल. पण अनेक लोकांना इतरांनी सांस्कृतिक काम केलेले हा आपल्या सांस्कृतिक नेतृत्वाचा अडथळा वाटत असल्यामुळे आज चळवळीचे विभाजन झाले आणि सगळाच बहुजन अडचणीत आला. यासाठी समान विचाराने स्वतंत्र काम करणे आणि पुन्हा सर्व चळवळी एकत्र येऊन त्याचा मुख्य प्रवाह बनवणे ही आजची गरज निर्माण झाली आहे. म्हणूनच बाबासाहेबांनी संघर्ष करा आणि संघटित व्हा असे सांगितले आहे. पण डॉ.बाबासाहेबांच्या जय घोषणेने आपण आपला परिसर दुमदुमून टाकतो, पण त्यांचे विचार मस्तकात घेऊन कृती मात्र आपण करत नाही. हे आजच्या बहुजनांच्या चळवळीचे दुर्दैव आहे. याचे कारण प्रत्येक समाजाने आपला महापुरुष वाटून घेतला आहे. महापुरुष समाजाने वाटून घेतल्यामुळे त्या त्या समाजाच मोठं नुकसान झालं आहे. मात्र कोणताच महापुरुष कोणत्याही एका जातीत बांधता येत नाही हे भान आपण ठेवलं पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पवार यांनी केले. तर प्रास्ताविक सूर्यकांत कदम यांनी केले.नचिकेत पवार यांनी आभार मानले.







